जबाबदार आपणच…
प्रखर राष्ट्रभक्त व ज्यांची खरी वारसदार आजही युवा पिढी आहे, असे आपले राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम. राष्ट्रपतींचे तेजस्वी विचार म्हणजे युवकांचे प्रेरणास्त्रोतच आहेत.
मित्र हो,
भारतीय एवढ्या संकुचित मनोवृत्तीचे का झाले आहेत? आपण आपले सामर्थ्य, कामगिरी का ओळखू शकत नाही? आपले राष्ट्र हे “महान’ आहे. आपल्या देशात घडलेल्या अनेक यशोगाथा आहेत, पण आपण त्यांची दखल घेतो का?आपण दूध उत्पादनाच्या बाबतीत जगात सर्वश्रेष्ठ आहोत, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटच्या बाबतीत आपल्या देशाचा पहिला क्रमांक लागतो. आपण जगातील दुसरे सर्वांत जास्त गहूउत्पादक राष्ट्र आहोत, त्याचप्रमाणे जगातील दुसरे सर्वांत जास्त तांदूळउत्पादक आहोत. डॉ. सुदर्शन यांच्याविषयी आपण कदाचित ऐकले असेल; त्यांनी एका दुर्लक्षित, आदिवासी खेड्याला एका स्वयंपूर्ण स्वयंचलित समूहामध्ये परिवर्तित केले. अशा लाखो यशोगाथा आहेत… पण आपली प्रसारमाध्यमे वाईट घटना, अपयश आणि संकटे यांनी पछाडलेली आहेत. मी एकदा तेल अवीवमध्ये असताना एक इस्रायली वर्तमानपत्र वाचत होतो. एक दिवसापूर्वीच “हमास’ने बॉम्ब हल्ले केले होते; पण वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मात्र एका कष्टाळू ज्यू माणसाचे चित्र होते. त्याने पाच वर्षांत आपल्या मालकीच्या वाळवंटातील जमिनीचे हिरव्यागार वनराईमध्ये रूपांतर केले होते. देशातील प्रत्येक जण जागृत व्हावा, इतके ते चित्र “प्रेरणादायी’ होते. बॉंबहल्ल्यांच्या मृत्यूच्या बातम्या वृत्तपत्राच्या आतल्या पानांत होत्या. भारतात आपण केवळ मृत्यू, रोगराई, दहशतवाद, गुन्हेगारी यांच्याच बातम्या वाचतो. आपला दृष्टिकोन एवढा नकारात्मक का आहे? आणखी एक प्रश्न ः आपण एक “राष्ट्र’ म्हणून विदेशी गोष्टी स्वीकारण्यास एवढे आतुर का झालो आहोत?
आपल्याला परदेशी कंपन्यांचे दूरचित्रवाणी संचच हवेत. ब्रॅंडेड शर्टस हवेत, आपल्याला विदेशी तंत्रज्ञान हवे आहे…
सगळ्या “इंपोर्टेड’ गोष्टींकडे आपला एवढा ओढा का?
“स्वाभिमान’ हा “स्वावलंबनातून’ येतो, ही साधी गोष्टसुद्धा आपल्याला का कळत नाही?मी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात असताना, १४ वर्षांच्या एका मुलीने मला “स्वाक्षरी’ मागितली. मी तिला विचारले- “”बाळा, तुझे आयुष्यातील ध्येय काय आहे? ती म्हणाली- “”मला, विकसित भारतात राहायचे आहे!तिच्यासाठी… नव्हे तर येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही आणि मी मिळून उद्याचा भारत उभा करायचा आहे. भारत हे विकसनशील राष्ट्र नसून, ते अत्यंत प्रगत व विकसित राष्ट्र आहे, हे तुम्हीच जाहीर करणार आहात.
तुम्ही म्हणता, आमचे सरकार अकार्यक्षम आहे.
तुम्ही म्हणता, आमची नगरपालिका कचरा उचलत नाही.
तुम्ही म्हणता, दूरध्वनी चालत नाहीत.
तुम्ही म्हणता, आमचा देश कुत्री आणि रस्त्यांवरच्या त्यांच्या घाणीला कंटाळला आहे.
आपण बोलतो… बोलतो आणि फक्त बोलतच राहतो! पण आपण “याकरिता’ काय करतो?
सिंगापूरमध्ये तुम्ही रस्त्यावर सिगारेटची थोटकं टाकू शकत नाही किंवा दुकानांबाहेर उभे राहून खाऊ शकत नाही.
तुम्ही संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत ऑचर्ड रस्त्यावरून (मुंबईतल्या पेडर रोड एवढा) वाहतूक करण्याकरिता सिंगापुरी ५ डॉलर (अंदाजे ६० रुपये) मोजता.
दुबईमध्ये रमजानच्या महिन्यात रस्त्यावर खाण्याची तुमची हिंमतही होणार नाही.
तुमची टेलिफोनची बिले कमी करण्यासाठी तुम्ही लंडनमधील टेलिफोन एक्स्चेंजच्या अधिकाऱ्यास १० पौंडामध्ये (अंदाजे ६५० रुपये) विकत घेणे शक्यच नाही.
बनावट प्रशस्तिपत्रके, पदवी प्रमाणपत्रे व परीक्षेत घोटाळा करणारे मध्यस्थ तुम्ही बोस्टनमधील विद्यापीठांत वापरू शकत नाही.
… आपण अजूनही फक्त एकाच विषयाबद्दल बोलत आहोत, तुमच्याबद्दल!
तुम्ही परदेशातल्या यंत्रणेची वाहवा करता, त्यांचे पालन करता; मात्र आपल्या देशातल्या नाही. ज्या क्षणी तुम्ही भारतीय भूमीवर उतरता, रस्त्यावर कागदाचे कपटे टाकण्यास, सिगारेटची थोटके टाकण्यास सुरवात करता….
आपण परदेशी एखाद्या व्यवस्थेचे पालन करू शकतो, त्यात समरस होऊ शकतो; त्यांचे कौतुक करू शकतो; तर भारतात का नाही?
आपण आपल्या देशात आपले लाड व्हावेत म्हणून नकारात्मक दृष्टिकोनातून बसून राहतो आणि शासनाने सर्व काही करावे, अशी अपेक्षा ठेवतो.
आपण रस्त्यावर कचरा फेकतच राहून शासनाने तो स्वच्छ करावा, अशी अपेक्षा ठेवतो.
हे सर्व जनतेला “सेवा’ प्रदान करणाऱ्या कर्मचारी वर्गालासुद्धा लागू आहे.
स्त्रिया, मुली, हुंडा, जातिव्यवस्था आणि इतर ज्वलंत सामाजिक प्रश्नांबाबत आपण रस्त्यावर निषेध व्यक्त करतो; आणि घरात मात्र “तेच’ करतो.
आपली सवय म्हणजे सगळी यंत्रणाच (system) बदलणे गरजेचे आहे. माझ्या एकट्याच्या बदलण्याने काय होणार, असे म्हणत आपण हुंडा मागतोच. तर आता मला सांगा- ही व्यवस्था कोण बदलणार? या व्यवस्थेचे भाग कोणकोण आहेत?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपले कुटुंबीय, शेजारी, आपली खेडी, आपली शहरे, आपले सरकार आणि स्वतः आपण! व्यवस्थेला सुधारण्यासाठी आपण आपला हातभार लावण्याची ज्या वेळेस गरज असते, त्या वेळेस आपण स्वतःला स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत एका कोशात बांधून दूर उभे राहतो. आणि कोणी तरी येऊन आपल्यासाठी ते करावे, ही अपेक्षा ठेवतो. आपण देशात राहतो; पण आपल्या कर्तव्यापासून दूर पळतो. भयाने पछाडलेले भ्याड लोक पळत राहतात.
आपण अमेरिकेत त्यांच्या वैभवाची, त्यांच्या मोठेपणाची ऊब घेत त्यांच्या व्यवस्थेचे कौतुक करतो; पण ज्या वेळेस न्यूयॉर्क “असुरक्षित’ वाटू लागते, आपण इंग्लंडला पळतो.
जेव्हा इंग्लंडला आपण बेरोजगारी अनुभवतो, आपण आखाती देशात पळतो. आणि जेव्हा तेथे युद्ध चालू होते; आपण आपल्या सुटकेची आणि मायदेशात शासनाने परत आणण्याची मागणी करतो!
सगळे जण देशाला, व्यवस्थेला शिव्याशाप देण्यास पुढे येतात. कोणीही व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी हातभार लावत नाही, पुढाकार घेत नाही. एवढंच काय, साधा विचारही करत नाहीत.
आपली सदसद्विवेकबुद्धी व कर्तव्याची जाणीव पैशापुढे गहाण टाकली जाते.
प्रिय भारतीयांनो,
आपल्याला विचारपरिवर्तनाची व आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे.
आपल्या अमेरिकन सहकाऱ्यांना जॉन एफ. केनेडींनी भारताविषयी जे विचार सांगितले, ते मी येथे सांगू इच्छितो…
“भारतासाठी आपण काय करू शकतो ते पाहा, आणि अमेरिका व इतर युरोपीय देशांप्रमाणेच भारताला प्रगत बनवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करा!’
तेव्हा, चला तर आपण “आपल्याच’ परमपवित्र मातृभूमीसाठी जे जे आवश्यक आहे, ज्याची आपल्या राष्ट्राला गरज आहे, ते करू यात!
आपला,
राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
Posted by bbharat
Posted by bbharat
Posted by bbharat